राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ते खरे ठरत असून, दिल्ली दौऱ्यावर परत येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.
अकोला महानगरपालिकेतील चार नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत हाती धनुष्यबाण घेतला आहे. सहापैकी चार नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याची चर्चा आहे.
अकोला महानगरपालिकेतील सहापैकी चार नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली असून, उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
रात्री दोन वाजता पक्षप्रवेश
अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर अनेक राजकीय तर्क वितर्क बांधण्यात आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत पक्षातील खासदार देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांविषयी चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा एकनाथ शिंदे राज्यात परतले. ते रात्री दोनच्या सुमारास ठाण्यात आले. त्यावेळी अकोल्यातील ठाकरे गटाचे नगरसेवक त्याठिकाणी आले होते. रात्री दोन वाजता या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
यामध्ये जिल्हा प्रमुखासह चार नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.
पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांची नावे
मंगेश काळे (जिल्हा प्रमुख उबाठा)
मनोज पाटील (नगरसेवक उबाठा )
सागर भरुका ( नगरसेवक उबाठा)
सोनाली सरोदे ( नगरसेवक उबाठा)
सुरेखा काळे ( नगरसेवक उबाठा)















Discussion about this post