जळगाव । राज्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहितीय. तो वाद कमी होण्याऐवजी अधिकच वाढला आहे. यातच एकनाथ खडसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमुळे भाजपातील प्रवेशाची घोषणा केली गेली नाही, असे खडसे म्हणाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल इतका राग का? याबद्दल त्यांनी मौन सोडले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
खडसे म्हणाले, “माझा राग तर काय आहे की, गिरीश तर पिल्लू आहे. गाडीखाली असते ना, त्या काय म्हणतो आपण? तशातला आहे. माझा राग खरे म्हटले तर मी नाव घेऊ इच्छित नव्हतो पण घेतो. माझा राग आहे, देवेंद्रजींवर!”
“मी कुणावरही राग व्यक्त केला नाही. मी कधी भाजपला म्हटले नाही. आजपर्यंत कुणा नेत्यावर नाही, कुणा मंत्र्यावर नाही. कधी मोदींवर नाही, कधी शाहांवर नाही. मी कधीही टीका टिप्पणी केली नाही”, असेही खडसे यावेळी म्हणाले.
“या लोकांवर असे आहे की, काहीतरी विचित्र सारखं करणं. उत्तर महाराष्ट्रात नेतृत्व माझं होतं. उत्तर महाराष्ट्रात मी प्रत्येक वेळी आठ-दहा आमदार निवडून आणलेले आहेत. सहा-सहा खासदार होते. आज नाहीये. आज आमचे दोन जळगावचे आहे, तेवढे मी आणले म्हणून. नाक राहीले”, असा टोला खडसे यांनी गिरीश महाजन यांना अप्रत्यक्षपणे लगावला.
Discussion about this post