धुळे । राज्यभरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात अपघात झाला. यात चारचाकी वाहनाची जोरदार धडक दिल्याने बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोन भावंडांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी चालक फरार झाला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या दुर्देवी घटनेनंतर धुळ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सेंधवाजवळील बारदवारी गावात राहणाऱ्या बहिणीचं निधन झालं. बहिणीच्या अंत्यविधीसाठी दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबासोबत जात होते. मात्र, बहिणीच्या अंत्यविधीला पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्यूनं गाठलं. दोघं ज्या दुचाकीवरून जात होते, त्याच दुचाकीला चारचाकीनं धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दगडू भावका बंजारा (वय ५५) आणि रामचंद्र सदू बंजारा (४५) असे मयत दोघा भावांची नावं आहेत. शिरपूर तालुक्यातील लौकी येथील रहिवासी असलेल्या बंजारा भावंडांच्या बहिणीचा सेंधवाजवळील बारदवारी गावात मृत्यू झाला होता. तिच्या अंत्यविधीला दुचाकीवरून जात असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
चारचाकीनं दुचाकीला जबर धडक दिली. या जबर धडकेत दोघांचाही दुर्देवी अंत झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीनं धडक दिल्यानंतर चालकानं तेथून पळ काढला. दरम्यान, फरार वाहनचालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
अपघात कसा घडला?
बहिणीच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीला दोघे भाऊ दुचाकीवरून निघाले होते. ते मुंबई-आग्रा महामार्गावरून जात होते. दुचाकी बिजासन घाटात आली. त्याचवेळी चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ती धडक इतकी जोरदार होती की, यात ते दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post