मुंबई | तीन वर्षांपूर्वीत भारतासह जगभरात धूमाकूळ घालणाऱ्या, लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या, कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसापासून देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याची चर्चा होती तर आता गोव्यामध्येही करोना विषाणूचा नवा उपप्रकार असलेल्या ‘जेएन १’चे रुग्ण सापडले आहेत.
त्यामुळे कोरोनाच्या भीतीने लोकांचं टेन्शन पुन्हा वाढायला लागलं असून याच पार्श्वभूमीवर देशभरात आणि महाराष्ट्रातही सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. कारण महाराष्ट्रातही या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. राज्यात काही ठिकाणी नवीन रुग्ण सापडत असले तर दक्षता घ्यावी, मात्र घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. सर्व लोकांनी बाहेर पडताना, आवश्यकतेनुसार मास्क घालावे, सोशल डिस्टन्सचे पालन करावे आणि वारंवार हात धुवावे, स्वच्छता बाळगावी अशा सूचनाही आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात स्थिती काय ?
संपूर्ण देशभरात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. देशात सध्या 2311 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ही वाढती आकडेवारी पाहता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे. गोवा, केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. WHO च्या म्हणण्यानुसार कोरोनाचा हा व्हायरस लवकर पसरत आहे, जे अत्यंत धोकादायक आहे. महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 45 इतकी आहे. त्यामध्ये मुंबईतील 27, ठाणे 8, रायगड 1, पुणे 8, कोल्हापूरमधील 1 रुग्ण यांचा समावेश आहे.
काय काळजी घ्याल ?
संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोनाने पुन्हा हातपाय पसरल्याने , त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने पुन्हा तयारी सुरू केली आहे. पण नागरिकांनी स्वत:ही खबरदारी घेऊन, योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
– गरज नसेल तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
– बाहेर जाताना, मास्कचा वापर अवश्य करा.
– वैयक्तिक स्वच्छता बाळगा, हात वारंवार धुवा.
– बर नसेल, सर्दी-खोकला- ताप , काहीही त्रास होत असेल तर दुखणं अंगावर काढू नका, त्वरित डॉक्टरांकडे जा.















Discussion about this post