अपूर्ण उमेदवारीमुळे काँग्रेस अडचणीत
मुंबई । मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीच्या युतीत समन्वयाचा अभाव उघड झाला आहे. जागावाटपानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात झालेल्या गोंधळामुळे काँग्रेसच्या रणनीतीला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
देशभराचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस–वंचित युतीला सुरुवातीलाच धक्का बसला आहे. युतीअंतर्गत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला 62 जागा सोपवल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात वंचितकडून केवळ 46 जागांवरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उर्वरित 16 जागांवर उमेदवार न मिळाल्याने अर्ज भरलेच गेले नाहीत.
या बाबतची माहिती अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर काँग्रेसपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. वेळेत माहिती न मिळाल्यामुळे काँग्रेसलाही त्या जागांवर अधिकृत उमेदवार उभे करता आले नाहीत. परिणामी, काही प्रभाग काँग्रेसच्या हातातून निसटले. युती टिकवण्यासाठी काँग्रेसकडून मुंबईतील अनेक प्रभाग वंचितला देण्यात आले होते, जिथे काँग्रेसची संघटनात्मक पकड तुलनेने मजबूत होती. मात्र मुंबईत वंचितची संघटनात्मक तयारी अपुरी ठरल्याने अनेक ठिकाणी उमेदवार उभे राहू शकले नाहीत. यामुळे युतीतील नियोजन आणि संवादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता या 16 प्रभागांमध्ये अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या बंडखोर उमेदवारांनाच काँग्रेसकडून अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची वेळ आली आहे. यामुळे अधिकृत युतीचा निर्णय काँग्रेससाठी अडचणीचा ठरल्याचे स्पष्ट होत आहे.या घडामोडींमुळे मुंबईतील काँग्रेसची निवडणूक रणनीती विस्कळीत झाली असून, युतीतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. 1999 नंतर प्रथमच काँग्रेस राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय असताना, मुंबईतील हा गोंधळ पक्षाला महागात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काँग्रेस राज्यभरात आक्रमक पवित्रा घेत असून मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख महापालिकांमध्ये मोठ्या संख्येने जागांवर निवडणूक लढवत आहे. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये पक्ष स्वबळावर मैदानात उतरला आहे.
मुंबई महापालिकेतील हा प्रकार काँग्रेस–वंचित युतीच्या भविष्यासाठी इशाराच ठरणार का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.















Discussion about this post