अहमदनगर –– भारताच्या स्वातंत्र्यासाठी , मराठी अस्मितेसाठी, मराठी रयतेसाठी, ब्रिटिशांविरुद्ध एकाकी झुंज देऊन करवीर संस्थांनचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज अहमदनगर येथे हुतात्मा झाले. त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे दरवर्षी राज्य साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी दिली.
हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या हुतात्म्या (स्मृती ) दिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार दरवर्षी २५ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येतात , पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे, यावर्षीचे पुरस्कार निवड समितीने परीक्षण करून जाहीर केले आहेत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने जिल्हाभर शिक्षण प्रसार करून ज्ञानगंगा प्रवाहित केली, संस्थेची विद्यालय व महाविद्यालये ग्रामीण भागात विद्या प्रसार करताना विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू व गरजा भागविण्यासाठी संस्थेने सहकारी ग्राहक भांडाराची स्थापना केली, अशा या भांडाराची वाटचाल यशस्वीरित्या चालू आहे. या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराच्या वतीने संस्थेचे प्रेरणास्थान असलेले हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येतात त्या पुरस्काराचा प्रदान सोहळा, सोमवार दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता संपन्न होत आहे अशी माहिती संस्थेचे सचिव व श्री. शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराचे सभापती जी. डी. खानदेशे यांनी दिली, सदर कार्यक्रमास साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथवितरक ,आणि साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
यावर्षीचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार २०२३ वाई येथील र.रा चव्हाण यांच्या लोकशाही समाजवादाची प्रेरक शक्ती राजर्षी शाहू (संपादित) नांदेड येथील अशोक कुबडे यांच्या गोंडर ( कादंबरी) सोलापूर येथील गणपत जाधव यांच्या हावळा (कथासंग्रह) परभणी येथील डॉ आनंद इंजेगावकर यांच्या स्त्री मुक्तीच्या युद्ध कथा (वैचारिक) जळगाव येथील शशिकांत हिंगोणेकर यांच्या युद्धरत ( काव्यसंग्रह) या साहित्य कृतींना राज्य साहित्य पुरस्कार देण्यात येत आहेत. तसेच कोल्हापूर येथील डॉ मधुकर जाधव यांच्या सरसेनापती प्रतापराव गुजर (ऐतिहासिक )या साहित्यकृतीला विशेष राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील साहित्य पुरस्कार कविवर्य चंद्रकांत पालवे यांच्या मोहोर उजेड वाटांवर (काव्यसंग्रह) या ग्रंथात जाहीर केला आहे तसेच संस्थेतील लेखक , साहित्यिक प्रा.भि.ना दहातोंडे, डॉ अविनाश महाजन, कवयित्री प्रा. शालिनी वाघ, रंगनाथ सुंबे यांचा साहित्य गौरव करण्यात येणार आहे, असे पुरस्कार निवड समितीच्या वतीने पुरस्कार निवड समितीचे कार्यकारी समन्वयक प्रा गणेश भगत यांनी मंगळवार दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्काराची घोषणा केली.
यावेळी अध्यक्ष रामचंद्र दरे सहसचिव अँड .विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार विवेक भापकर, भांडाराचे सभापती व संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे चेअरमन दत्ता पाटील नारळे, व्हा. चेअरमन विजय जाधव व श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराचे सर्व पदाधिकारी व पुरस्कार निवड समिती सदस्य प्रा मेधाताई काळे, प्राचार्य एम. एम. तांबे, प्रा डॉ .बापू चंदनशिवे , व्यवस्थापक विजय कोंडावार , समन्वयक लेखक प्रा. गणेश भगत उपस्थित होते.
Discussion about this post