अहमदनगर : भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा, अशी टीका विरोधी व स्वपक्षातले लोक माझ्यावर करतात; पण १६ नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊनच मी दुसऱ्या दिवशी अंबडच्या ओबीसी मेळाव्याला गेलो होतो, असा खळबळ उडवून टाकणारा गौप्यस्फोट अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. भुजबळांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे.
अहमदनगरमध्ये ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून ओबीसी समाजाला संबोधित करताना छगन भुजबळ यांनी मोठं विधान केले आहे. यावेळी भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण देऊ नका एवढीच आमची मागणी आहे. मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही, पण मुख्यमंत्र्यांनी २७ जानेवारीला वाशी येथे मराठा मोर्चाला सांगितले की ‘आरक्षणासंदर्भात घेतलेली शपथ मी पूर्ण केली. त्यानंतर मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला गेला. मग मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण कशासाठी केले जात आहे?
सर्वेक्षणावेळी अगोदर जात विचारतात. पुढे धडाधड खोटी उत्तरे लिहितात, बंगला, गाड्या-घोड्या असतील तरी ते लपवितात. नोंदीमध्ये खाडाखोड करून ‘सगेसोयरे’ म्हणून खोटी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. ३६० कोटी रुपये देऊन आरक्षणाचे खोटे रेकॉर्ड तयार केले जात आहे. खोटे प्रमाणपत्र दिलेले कुणबी दाखले माझ्याकडे आहेत, असे ते म्हणाले
आमच्या हक्काची लढाई आम्ही लढतोय!
मनोज जरांगे यांचे नाव न घेता भुजबळ म्हणाले, मला मराठा समाजाच्या नेत्यांची, विचारवंताची कीव येते. हा तुमचा नेता कसा? जो बजेटमधून आरक्षण देता येते का बघा असं म्हणतो. यावर कुणीच बोलायला तयार नाही. कुणाच्या मागे जाताय? गावागावात दरी पडतेय. मराठा समाजाला त्यांचे वेगळे आरक्षण द्या. आमच्यातून नको असे बोलणे चुकीचे आहे का? ओबीसीतून आरक्षण घ्यायचे व मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा केली जाते, असे भुजबळ म्हणाले.















Discussion about this post