जळगाव | भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील जमीन व्यवहार प्रकरणाला आता गंभीर वळण लागले असून खरेदीखतात खाडाखोड केल्याचा आरोप समोर आल्यानंतर आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा एकनाथ खडसे यांच्याविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, 2002 साली भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील महार वतनाची जमीन साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली खरेदी करण्यात आली होती. यात गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. खरेदी करतांना तायडे कुटुंबाला जमीनाचा चांगला मोबदला मिळण्यासही कुटुंबातील सदस्यांना नियोजीत तापी-पुर्णा सहकारी साखर कारखान्यात रोजगार मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. यानुसार तायडे कुटुंबाला एकनाथ खडसे यांच्याकडून अगावू ५१ हजार रूपये देण्यात आले. यानंतर सर्वांचे कागदांवर अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीनीची खरेदी करण्यात आली. यानंतर उर्वरित पैशांसाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील या कुटुंबाला देण्यात आलेली नाही.
दरम्यान, अनेक वर्षांनंतर या जमिनीवर कारखाना उभारण्यात न आल्याने तायडे कुटुंबाने कागदपत्रांची चौकशी केली असता जमीन प्रत्यक्षात शारदा एकनाथ खडसे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. तसेच मूळ खरेदीखतात कंपनीचे नाव बदलून वैयक्तिक नाव टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांना चौकशीचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार तक्रारदार चमेलाबाई तुकाराम तायडे यांच्या फिर्यादीवरून एकनाथ खडसे यांच्या कन्या शारदा खडसे व मध्यस्थ व्यक्ती तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेमुळे जुने जमीन व्यवहार, वतन जमिनींचे नियम आणि शासकीय नोंदणी प्रक्रियेतील त्रुटींवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाचा तपास पुढील काळात अधिक गतीने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post