मुंबई । राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका येत्या २ डिसेंबरला पार पडणार आहेत. यानंतर राज्यात लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह महापालिकाच्या निवडणुका होण्याची देखील शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान या सर्व निवडणुकांपूर्वी भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे राज्यात भाजप भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही जास्तीत जास्त तरुणांना संधी देणार आहोत. आमचा पक्ष येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी 40 टक्के जागा या 35 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या तरुणांना देणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपच्या या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये महानगरपालिकेपासून सर्वच निवडणुकांचा समावेश असणार आहे.
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटानं देखील असाच निर्णय घेतला आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सर्व नेत्यांना सूचना केली होती की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जास्तीत-जास्त तरुणांना संधी द्या, दरम्यान त्यानंतर आता भाजपकडून देखील असाच निर्णय घेण्यात आला आहे, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. भाजपकडून आता तरुणांना जास्तीत जास्त संधी या निवडणुकीमध्ये दिली जाणार आहे.















Discussion about this post