मुंबई । आगामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्धार महायुतीच्या प्रमख नेत्यांनी केला आहे. मात्र, बहुंताशी ठिकाणी मैत्रीपूर्ण किंवा मग स्वबळाचा नारा अशीच परिस्थिती उद्धवण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
बदलापुरातून महायुतीमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे. बदलापुरात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली. बदलापूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती झाल्यामुळे शिवसेना शिंदे गट आता स्वबळावर लढणार आहे. खरंतर अंबरनाथ बदलापूर पालिकेत यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती. पण सध्याची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलेली आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग वाढलेले आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी आपली ताकद वाढवत राष्ट्रवादी काँग्रेश शरदचंद्र पवार पक्षाचे अंबरनाथाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांना आपला पक्षात प्रवेश देत त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. यामुळे शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा या नगरपालिकेत येण्यासाठी कष्टाची पराकाष्टा पक्षाला करावी लागणार आहे.
येत्या काही दिवसात नगरपरिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांसारख्या निवडणुका पार पडणार आहेत. जिल्हास्तरापासून ते छोट्याश्या गावापर्यंत कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका महत्वाच्या आहेत.
मात्र, भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेविरोधात दंड थोपडले आहेत. भाजपने या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी येणारी निवडणूक मोठे आव्हान निर्माण होणार असल्याची चर्चा होत आहे.















Discussion about this post