मुंबई । मुंबई अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या (एनसीपी) विलीनीकरणाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. मात्र आता हा विषय पूर्णपणे बंद केल्याचे स्पष्ट संकेत शरद पवार गटाकडून देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबतच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, ‘दादा (अजित पवार) असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबतचा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबाबत बोलत आहेत. मात्र, आता आम्ही हा विषय पूर्णपणे बंद केला आहे. आम्हीच विलीनीकरणाच्या मागे लागलो आहोत, असं चित्र निर्माण करण्यात येत आहे.
आमच्याकडून यासाठी कोणतीही गडबड करण्यात आलेली नाही. दादांच्या निधनानंतरच या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो, शपथपूर्वक बोललो. त्यानंतर आम्ही कधीच या विषयावर बोललेलो नाही. आम्ही एवढंच सांगितलं की, दादांची ही इच्छा होती आणि ती पूर्ण करायची आहे. मात्र, आता यावर बोलायचं नाही, हे आम्ही ठरवलं आहे.’
विलीनीकरणाच्या चर्चांना विरोध कोण करत आहे? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा या विलीनीकरणाला विरोध दिसून येत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, शिंदे म्हणाले की, ‘या बाबतीत मी काही बोलणार नाही, कारण त्यांची भूमिका त्यांनीच मांडावी. आता आम्ही पुन्हा जोमाने काम करून पक्ष उभा करण्याची भूमिका घेत आहोत. त्यामुळे याबाबत त्यांची काय भूमिका आहे, हे मी सांगणं योग्य ठरणार नाही.’
विलीनीकरणानंतर पक्षाची दिशा काय असणार होती? विलीनीकरण झाल्यानंतर तुम्ही एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सोबत जाणार होतात की अजित पवार एनडीएतून बाहेर पडणार होते? या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘याबाबत काय निर्णय घ्यायचा, हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार होतं. त्यांच्या मनात काय होतं, माझ्या मनात काय होतं, हे आता गेल्यानंतर सांगणं योग्य नाही. याबाबत एनडीए सोबत त्यांनी चर्चा करावी. इथून पुढेही एनडीए सोबत जायचं की नाही, हा त्यांचा निर्णय असणार आहे. सुनेत्रा वहिनींचा तो अधिकार असणार आहे.’
या भाष्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील विलीनीकरणाच्या चर्चा थांबल्या आहेत, असे दिसून येत आहे. शरद पवार गट आता स्वतंत्रपणे पक्ष बांधणीवर भर देत असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाची भूमिका काय असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात या घडामोडींचा पुढील परिणाम कसा होईल, हे येणारा काळ ठरवेल.















Discussion about this post