नवी दिल्ली । रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या तिकीटदरात तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तिकिटामध्ये 10 ते 30 रुपयांची घट झाली आहे. यापूर्वी प्रवाशांना पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेनचे भाडे द्यावे लागत होते. मात्र आता तिकीट दर कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर आले आहेत.
भारतीय रेल्वेने 27 फेब्रुवारीपासून ‘पॅसेंजर ट्रेन्स’चे सामान्य द्वितीय श्रेणीचे भाडे पूर्ववत केले आहे. त्यांना आता ‘एक्स्प्रेस स्पेशल’ किंवा ‘डेमू एक्सप्रेस’ गाड्या म्हणतात. कोविड-19 महामारीच्या काळात प्रवासी गाड्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरू झाल्यावर किमान तिकिटाची किंमत 10 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आली. हे एक्स्प्रेस गाड्यांच्या भाड्यानुसार होते. मात्र नुकत्याच झालेल्या घोषणेनंतर ही किंमत अर्ध्यावर आली असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सर्व मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (MEMU) ट्रेन आणि ‘झिरो’ पासून सुरू होणाऱ्या ट्रेन्ससाठी साधारण वर्गाच्या भाड्यात सुमारे 50 टक्क्यांनी कपात केली आहे. अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) ॲपमधील भाडे रचना देखील त्यानुसार बदलण्यात आली आहे. ज्यांचे आधी पॅसेंजर ट्रेन म्हणून वर्गीकरण करण्यात आले होते आणि आता त्या देशभरात ‘एक्स्प्रेस स्पेशल’ किंवा मेमू ट्रेन म्हणून धावत आहेत अशा गाड्यांसाठी ही भाडे कपात लागू आहे
Discussion about this post