अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेसोबत भारतावरही जाणवू लागला आहे. विशेषतः ऊर्जा क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होत असून देशात इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती कायम राहिल्यास दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील हालचाली मर्यादित केल्याने जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला आहे. याचा परिणाम भारतातील एलपीजी गॅस आणि नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेवर होत असल्याचे संकेत मिळत आहेत. काही भागांत गॅस पुरवठा उशिरा होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर औद्योगिक क्षेत्रालाही वेळेवर गॅस न मिळाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्य आणि खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ होऊ लागली आहे. मागील महिनाभरात खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे बाजारातील आकडेवारीतून दिसून आले आहे. विशेषतः सूर्यफूल तेलाच्या दरात एका महिन्यात सुमारे १० रुपयांची वाढ झाली असून, प्रति किलो दर १७५ रुपयांवरून १८५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच पाम तेल, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल आणि मोहरी तेलाच्या किमतीतही वाढ नोंदवली गेली आहे.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरता कायम राहिल्यास आगामी काळात इंधन आणि खाद्यपदार्थांच्या किमती आणखी वाढू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त आर्थिक ताण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post