मुंबई : पंढरपूर आषाढी वारीसाठी राज्य शासन सज्ज झाले असून, वारकऱ्यांना यंदाही टोलमाफी, विमा सुविधा आणि वैद्यकीय मदत देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत यावर्षीच्या वारीसाठी प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचा गट विमा केला जाणार असून, त्यांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी आरोग्य शिबिरे आणि तात्पुरत्या आयसीयू सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील.”
पावसामुळे खराब झालेल्या वारी मार्गांची तात्काळ डागडुजी केली जाणार असून, पालखी मार्गावर पाणी, वीज आणि वॉटरप्रूफ तंबूंची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच, यंदाही वाहनांवरील टोल पूर्णतः माफ केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात वारी मार्गावर भव्य आरोग्य शिबिरे, कार्डियक रुग्णवाहिका, जिल्हास्तरावर सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था केली जाईल. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना स्वतः पंढरपूरला जाऊन तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वारी दरम्यान समन्वय राखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमले जातील. गतवर्षी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच वारकऱ्यांच्या भोजन व प्रथा वेळेत पार पडाव्यात यासाठी सरकार विशेष लक्ष देणार आहे. “आपली वारी ही स्वच्छ, निर्मल आणि हरित वारी व्हावी, यासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल.” असेही शिंदे म्हणाले.
Discussion about this post