जळगाव: अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनची साखळी खेचून तब्बल अर्धा तास दगडफेक करण्यात आली. अमळनेरजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पण प्रवाशांमध्ये एक भितीचे सावट निर्माण झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, १२ जुलै रोजी अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची रेल्वेमध्ये गर्दी होती. भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून 11 वाजता सुटली. या रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले होते. भोरटेक रेल्वेस्टेशन पूर्वी काही यात्रेकरूंनी धार टेकडीजवळ साखळी ओढत रेल्वेला थांबवले.
रेल्वेवर तब्बल अर्धा तास दगडफेक
यानंतर हजारो यात्रेकरू त्याठिकाणी उतरले. यावेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर तब्बल अर्धा तास दगडफेक केली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे प्रवासी चांगलेच धास्तावल्याचे दिसून आले.
Discussion about this post