भडगाव । जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील गिरणा नदीपात्रात एका धाडसी तरुणाने दोन लहान मुलांना वाचवताना स्वतःचा प्राण गमावला, तर १६ वर्षीय मुलीचा देखील बुडून मृत्यू झाला. नदीन खान नसीम खान (२७) आणि काफिया शरीफ पिंजारी (१६) असे पाण्यात बुडाल्याने मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ही घटना ८ मार्च रोजी घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही मुले नदीत आंघोळीसाठी उतरली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ती गटांगळ्या खाऊ लागली आणि बुडू लागली. यावेळी २५ वर्षीय नदीम खान नदीत उडी मारून दोन मुलांना सुखरूपपणे वाचवले. मात्र, याच वेळी काफिया पिंजारी ही मुलगी खोल पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या लक्षात आले.
नदीमने क्षणाचाही विलंब न करता काफियाला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. काफियासोबत तो देखील खोल पाण्यात बुडाला. नदीपात्रातील खोल खड्डा आणि पाण्याचा वेग यामुळे दोघांनाही पाण्यात तग धरता आला नाही. दरम्यान, ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने गिरणी नदीकडे धाव घेतली. काहींनी दोघांना शोधण्याचा आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांनाही बाहेर काढल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
भडगाव पोलिसांनी प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे. दोन मुलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा बलिदान देणाऱ्या नसीम खानच्या धाडसाचे कौतुक होत असले तरी, या घटनेने दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून भडगाव शहरावर शोककळा पसरली आहे.















Discussion about this post