रावेर तालुक्यातील सावदा महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सन २०२४-२५ च्या आंबिया बहार हंगामासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना एकूण ११.०७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.ही माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली. आ. एकनाथराव खडसे यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, १६२२ नुकसानग्रस्त व पात्र शेतकऱ्यांसाठी ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित करताना आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, रावेर तालुक्यातील सावदा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२४ मध्ये हवामान आधारित फळपीक विमा काढला होता. नियमानुसार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र १३ डिसेंबर २०२५ पर्यंतही सावदा मंडळातील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे नुकसानभरपाई तत्काळ मंजूर करून संबंधित विमा कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करावी तसेच सावदा, उदळी, तांदलवाडी व परिसरातील बाधित शेतकऱ्यांना व्याजासह विमा रक्कम मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये सावदा महसूल मंडळातील १६२२ नुकसानग्रस्त व पात्र शेतकऱ्यांसाठी एकूण ११,०७,२६,२७८ रुपये इतकी नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे.
विमा भरपाई वितरण प्रक्रियेतील विलंबाबाबत बोलताना मंत्री भरणे यांनी सांगितले की, भारतीय कृषी विमा कंपनीकडून आवश्यक निधी नोव्हेंबर २०२५ अखेरीस प्राप्त झाला असून, राज्य शासनाकडून निधी वितरीत करण्याची तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने विमा भरपाई जमा केली जाईल. सावदा, उदळी, तांदलवाडी व परिसरातील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या आर्थिक अडचणींवर काही प्रमाणात हातभार लागण्याची अपेक्षा आहे.














Discussion about this post