(लोकराज्य मधून साभार)
‘अस्पृश्यता निवारणाच्या एका मागोमाग एक अशा पाच परिषदेच्या जत्रा भरल्या जात होत्या, अशा १९२० च्या उगवत्या महिन्यात अस्पृश्यतेच्या तेजोभंगाला कारणीभूत ठरणाऱ्या तत्कालीन स्वातंत्र्याच्या चळवळींना बाबासाहेबांचा हा बहिष्कृतांच्या बंडखोरीचा एल्गार मुंबईसारख्या शहरात प्रथमच ऐकायला मिळत होता. हाच एल्गार पुढे ‘आरक्षण’ नीतीत रुपांतरित झाला. पण ‘आरक्षण’ हे ‘संधीसाठी’ असतं, ते गुणवत्तेशी तडजोडी करत नसतं, हाही संदेश बाबासाहेबांनी याच पहिल्या वाहिल्या भाषणात आपल्या अनुयायांना दिला.
क्रीडा क्षेत्रातल्या एका जातीयवादी प्रकरणाची बातमी वृत्तपत्रात आली आणि मुंबई प्रांतात एकच खळबळ उडाली. बातमी होती उपकप्तानपदी नियुक्त झालेल्या व्यक्तीची. त्या व्यक्तीचे नाव होते पी. बाळू आणि खेळ होता क्रिकेट. हे घडले तेव्हा इ.स.चे साल होते १९११. भीमराव त्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. त्यांनाही क्रिकेट हा खेळ खूप आवडायचा. पी. बाळू म्हणजे एलफिस्टन हायस्कूलचा माजी विद्यार्थी. बाबासाहेब (भीमराव) हे ही याच शाळेचे विद्यार्थी, पी. बाळू त्यांच्यापेक्षा खूप
सीनियर होते. शाळेत शिकत असल्यापासून त्यांना पी. बाळू यांची गोलंदाजी खूप आवडत असे. पी. बाळूची इ. स. १९११ साली उपकप्तानपदी नियुक्ती झाल्यानंतर एवढी खळबळ का उडली? क्रिकेट जगतातला एक डावखुरा फलंदाज म्हणून १९०७ पासून पी. बाळूने या खेळातली आपली चमक दाखवली होती. मग त्याच्या नियुक्तीने खळबळ का उडावी? कारण इतकी वर्ष सर्व प्रेक्षक पी. बाळूचा खेळ पाहून प्रभावित झाले होतेः पण तो जन्मजातीने चर्मकार आहे हे क्रिकेट शौकिनांना पहिल्यांदाच कळत होते. त्यामुळे त्यांच्या मनातला जन्मजातीचा द्वेष उफाळून वर आला होता. खरे तर क्रिकेट हा ब्रिटिशांचा राष्ट्रीय खेळ. त्यामुळे त्याला खूप प्रतिष्ठा होती. नोकरी करण्यासाठी आणि अन्य व्यवसायासाठी जे ब्रिटिश भारतात आले त्यांनी क्रिकेटची मैदानी निर्माण केली, क्रिकेटचे संघ निर्माण केले आणि या देशातल्या मागास जनतेपासून त्यांनी स्वतःचे वेगळेपण राखले.
पुढे भारतातल्या संस्थानिकांचे राजपुत्र, नवाबांची मुले आधुनिक शिक्षणासाठी लंडनला जाऊ लागले. त्यामुळे त्यांनाही या खेळाची गोडी लागली. भारतात परत आल्यानंतर लष्करात ते अधिकारपद स्वीकारून इंग्लंडच्या अधिकाऱ्यांशी बरोबरीच्या नात्याने वागता वागता तेही ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर खेळातले नैपुण्य दाखवू लागले. त्यावेळी पासून आजतागायत क्रिकेट हा खेळ अत्यंत उच्चभ्रू जाती आणि श्रीमंतांच्या खेळाडूंनी प्रभावित झालेला आहे. राष्ट्रीय खेळाची प्रतिष्ठा असल्यामुळे भारतातल्या उच्च मध्यमवर्गीयांना या खेळात रस घेणे यात एक प्रकारची सुप्त स्वरूपातली त्यांची प्रतिष्ठा सुखावत असे. मग अशा या खेळात पी. बाळू कुठून आला, आणि कसा? आणि अशा या पी. बाळूचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा सत्कार समारंभ केव्हा आणि कसा घडवून आणला? याची अनेकांना माहिती नसणार. कारण या घटनेला आता १०० वर्षे उलटून गेली आहेत.
फलंदाजीचा सराव करताना गोरे खेळाडू मैदानात दूर-दूर पोहोचणाऱ्या चेंडूला आपल्याकडे फेकण्यासाठी एखाद्या चुणचुणीत मुलाची निवड करत. त्यासाठी त्या मुलाला तीन रुपये महिना देत असत. मि. ट्रान्स नावाच्या एका गोऱ्या अधिकाऱ्याने या पी. बाळूला त्या कामी नोकरीला लावले. हा मुलगा त्यावेळी शालेय शिक्षण घेत होता. त्या शाळेचे प्राचार्य होते सुभेदार रामजी आंबेडकर. पुढे पी. बाळूचा भाऊ पी. विठ्ठल हाही क्रिकेटर म्हणून चमकला. इंग्रजांनी आपल्या लष्करात स्थानिकांना भरती करताना त्यांचे प्राथमिक पातळीवर शिक्षण व्हावे म्हणून शाळा काढलेल्या असत. त्या शाळेला नॉर्मल स्कूल म्हणत. अशा शाळेवर एखाद्या कर्तबगार सुभेदाराची प्राचार्यपदी नियुक्ती केली जात असे. एवढेच नाही, तर सैन्यात भरती होणाऱ्या शिपायांच्या मुलामुलींनाही या शाळेत शिक्षण मिळत असे. इंग्रजांच्या या धोरणामुळे लष्करातही अस्पृश्य खूप प्रगत झाले. पी. बाळू धारवाडच्या छावणीत नोकरीस असलेल्या शिपायाचे चिरंजीव होते. धारवाड हा जिल्हा त्यावेळी मुंबई प्रांतात होता. त्यांचे घराणे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालवणी गावचे. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी पुण्याच्या नॉर्मल स्कूलमध्ये बाळूला दाखल केले. त्याने शाळा शिकत शिकत, आपल्या गोऱ्या साहेबांना चेंडू पोहोचवता पोहोचवता गोलंदाजी आत्मसात केली. एका परीने हा महाभारतातल्या एकलव्याचा आधुनिक अवतार होता. पी. बाळू ‘पुना यंग क्रिकेटर संघाचा’ खेळाडू झाला. पुढे हा पी. बाळू शिक्षणासाठी मुंबईला आला. एलफिस्टन हायस्कूलमध्ये दाखल झाला आणि त्याची खेळातली चमक पाहून त्याला ‘मुंबईच्या यंग मेन्स क्रिकेट क्लब’मध्ये खेळायची संधी मिळाली. युरोपीय क्लब आणि पुना यंग क्रिकेटर संघ यांचे सामने होताना कळत नकळत सामन्यांना देशभक्तीचा रंग चढत असे. त्याचाच अवशेष म्हणजे आजही पाकिस्तानविरुद्ध भारत असा सामना सुरू झाला की, भारतीयांच्या मनातले स्वदेश प्रेम उसळ्या मारून वर येते. तो काळ तर या दृष्टीने अधिकच संवेदनशील होता. कारण पुणे शहरातल्या दैनंदिन जीवनात लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी प्रेमाचे जबरदस्त वारे वाहत होते. हळूहळू भारतातील इंग्रजांचा एक वेगळा क्रिकेट संघ अस्तित्वात आला. आता या संघाला स्वतःचे नैपुण्य दाखवावे असे वाटू लागले.
या इर्षेतून लंडनचा ‘युरोपीय क्लब’ विरुद्ध भारताचा ‘यंग मेन्स क्लब’ असा एक सामना ८ फेब्रुवारी १९०६ रोजी रंगला. या सामन्यात पी. बाळूने आपल्या खेळाची चमक दाखवली. इ.स १९११ च्या सामन्यात भारतीय संघ जिंकला. आता या संघात भारतीय खेळाडू वाढले होते; पण दोन्ही संघांनी पी. बाळूची गोलंदाजी पाहून तोंडात बोटे घातली. यानंतर पी. बाळू सतत एक दशक क्रिकेट संघात आपले
कर्तृत्व दाखवत होता; पण त्याला कधीही कप्तानपद मिळाले नव्हते.
या काळात पी. बाळू पॅव्हेलियनमध्ये बसून लंच घेऊ शकत नव्हता. त्याला डिस्पोजेबल कपातून चहा मिळत असे. चहा पॅव्हेलियनमध्ये बसून पिता येत नसे. लंचसाठी त्याची वेगळ्या टेबलवर व्यवस्था असे. इतकेच नाही तर मुंबईच्या इराण्यांच्या हॉटेलमध्ये अस्पृश्यांसाठी वेगळे कप ठेवले जात. इ.स १९९८ साली बाबासाहेब सिडनेहम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले, तेव्हा पी. बाळूला अशी वागणूक
दिली जाते हे त्यांना कळले. युरोपच्या दौऱ्यावर इ.स १९०६ साली भारतीय संघ जेव्हा निघाला, तेव्हा संघातल्या काही खेळाडूंनी आणि व्यवस्थापकामधील तेलुगू ब्राह्मणांनी पी. बाळूच्या समावेशास विरोध केला. त्यामुळे क्रिकेटच्या अंतर वर्तुळात पी. बाळूच्या जन्मजातीवरून त्यांना तिरस्काराची वागणूक दिली जाऊ लागली. इ.स. १९११ साली कप्तान देवधरांच्याऐवजी कप्तानपद पै यांच्याकडे आले. पै यांनी पी. बाळूची उपकप्तानपदी नियुक्ती केली. खरे तर कप्तानपदाची पात्रता असूनही जन्माने अस्पृश्य असल्यामुळे पी. बाळूला कप्तानपद मिळाले नव्हते. त्यांना उपकप्तानपदावर समाधान मानावे लागले; पण उच्चभ्रू क्रिकेट शौकिनांना पी. बाळूचे उपकप्तानपदही सहन झाले नाही.
१९११चा सामना एवढा चुरशीचा झाला की, पी. बाळू हा जन्मजातीने चर्मकार आहे हे विसरून क्रिकेट विश्वात त्याच्या खेळाचा खूपच गौरव केला. क्रिकेटच्या जगात पी. बाळू यांचा दरारा वाढतच गेला. अशा या पी. बाळूचा जाहीर सत्कार केला पाहिजे, हे बाबासाहेबांनी सीताराम नामदेव शिवतरकरांना सांगितले. शिवतरकर हे जन्माने चर्मकार होते आणि मुंबईत बाबासाहेबांनी सार्वजनिक कामात गुंतून घेतल्यानंतरचे तेच त्यांचे पहिले जीवश्चकंठश्च
मित्र होते. परळच्या म्युनिसिपाल्टी शाळेत ते शिक्षक होते. २५ जानेवारी १९२० रोजी मुंबई येथे करीमभाई इब्राहीम कामगार समाजाच्या लायब्ररीत पी. बाळूचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. रोहिदास समाजातील अनेक कार्यकर्ते या समारंभास उपस्थित होते. कोल्हापूरहून दत्तोबा पवार मुद्दाम या कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. दत्तोबांचे कोल्हापुरात ‘लोकमान्य वाहनांचे’ दुकान होते. स्वतः राजर्षी शाहू महाराज दत्तोबांना अत्यंत सन्मानाने वागवत असत. लायब्ररी हॉलमध्ये बसायला जागा मिळणार नाही म्हणून पी. बाळूचे अनेक चाहते हॉलबाहेर उभे राहून कार्यक्रम ऐकत होते. रोहिदास विद्यावर्धक समाजाच्या वतीने हा सत्कार समारंभ
आयोजित केला होता. या कार्यक्रमात बाबासाहेबांचे अतिशय चेतना देणारे भाषण तर झाले, पण त्यांनी स्वतःच पी. बाळूचे मानपत्र लिहिले होते, तेही अत्यंत आदरपूर्वक पद्धतीने वाचून दाखवले. आज हे मानपत्र ‘मूकनायक’च्या फेब्रुवारी १९२० च्या अंकात वाचकांना वाचायला मिळू शकते.
बाबासाहेबांनी लिहिलेले मानपत्र
त्या मानपत्रावर मजकूर खालीलप्रमाणे होता;
श्री. बाळू बाबाजी पालवणकर आणि त्यांचे बंधू पी. विठ्ठल यास, या अधोगतीप्रत पोहोचलेल्या भारतखंडात जी काही थोडीशी नवरत्ने निर्माण झाली आहेत, त्यात आपली व आपल्या बंधूंची प्रामुख्याने गणना होते,
याचा आपल्या जातिबांधवास मोठा अभिमान वाटतो. या भारतखंडाने आपल्या अन्याय्य जातिबंधनाने रोहिदास समाजाचे इतके नुकसान केले आहे, त्या भारतखंडाची लाज आज अनेक वर्षे होत असलेल्या क्रिकेटच्या चौरंगी सामन्यात हिंदूंचा झालेला अपूर्व विजय सर्वस्वी आपल्या व आपल्या बंधूच्या अप्रतिम खेळामुळेच झाला हे निर्विकार आहे… आपणास हिंदू टीमच्या कॅप्टनचा दर्जाही ‘गुणकर्म विभागशः’ या न्यायाने मिळावयास पाहिजे होता; हे घडले नाही ही खरोखर खेदाची गोष्ट आहे; पण आश्चर्याची खास नव्हे! निदान आपली नीती सुधारणाऱ्या सुधारल्याखेरीज आपली उन्नती होणे नाही, असा उपदेश करणाऱ्या नीतिमान हिंदूंना लाजवणारी तरी ही गोष्ट आहे!
क्रिकेटसारख्या परकीय खेळात आपले मन पूर्णपणे घालून, अनुपम ग्राहकतेने त्यातील मर्म समजून घेऊन तो खेळ आपण आपल्या आपलासा केलात… क्रिकेटचे माहेरघर जो इंग्लंड देश तेथेही लोकांनी आपल्या क्रिकेट पुरत्वाची वाखाणणी केली आहे!
बाबासाहेबांचा संदेश
मानपत्र वाचून झाल्यानंतर बाबासाहेबांनी पी. बाळंना ते चांदीच्या करंड्यातून प्रदान केले; पण त्यानंतर त्यांनी जे भाषण केले ते अतिशय महत्त्वाचे होते, ते म्हणाले, ‘आम्ही लायक नाही म्हणून आमची स्वराज्याची मागणी लांबवत नेणाऱ्या आमच्या सरकारने पी. बाळूचे उदाहरण लक्षात घ्यायला पाहिजे; आम्ही पुरते लायकच नाही तर पुरेसे सोशिकही आहोत! म्हणून तर या पी. बाळूना कप्तानपद मिळावे याची आम्ही कधी मागणी केली नाही किंवा त्यांना डावलले: याची साधी तक्रारही केली नाही.’
‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असे इंग्रजांना गर्जून सांगणारे लोकमान्य टिळक अजून ह्यात होते; रोलेट अॅक्ट हा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारा कायदा आहे, असे सांगून असहकाराच्या आंदोलनाद्वारे महात्मा गांधींचा स्वातंत्र्य चळवळीत उदय होत होता आणि गेल्या वर्षभरात ‘अस्पृश्यता निवारणा’च्या एका मागोमाग एक अशा पाच परिषदेच्या जत्रा भरल्या जात होत्या, अशा १९२० च्या उगवत्या महिन्यात अस्पृश्यतेच्या तेजोभंगाला कारणीभूत ठरणाऱ्या तत्कालीन स्वातंत्र्याच्या चळवळींना बाबासाहेबांचा हा बहिष्कृतांच्या बंडखोरीचा एल्गार मुंबईसारख्या शहरात प्रथमच ऐकायला मिळत होता. हाच एल्गार पुढे ‘आरक्षण’ नीतीत रुपांतरित झाला. पण ‘आरक्षण’ हे ‘संधीसाठी’ असतं, ते गुणवत्तेशी तडजोडी करत नसतं, हाही संदेश बाबासाहेबांनी याच पहिल्या वहिल्या भाषणात आपल्या अनुयायांना दिला.
(लेखक हे ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व व्याख्याते आहेत.)
Discussion about this post