जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे प्रशाळेअंतर्गत ४ वर्षीय बी. ए. सोशल सायन्सेस अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया दि. १ जूनपासून सुरू होणार आहे. चार वर्षांच्या या अभ्यासक्रमात मेजर अर्थशास्त्र व राज्यशास्त्र आणि मायनर स्टॅटीस्टिक्स व मॅनेजमेंट अशी रचना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाच्या या प्रशाळेत गतवर्षापासून बी.ए. सोशल सायन्सेस (सामाजिक शास्त्र) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. १२ वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ३० आहे. गतवर्षी २८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. या अभ्यासक्रमांतर्गत मल्टिपल एन्ट्री-एक्झिट, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन, मातृभाषेत शिक्षण आदी सोशल सायन्सेसचा विद्यार्थी विज्ञान अथवा वाणिज्य शाखेतील विविध व्यावसायाभिमुख अभ्यासक्रमाचे अध्ययन करू शकेल. पहिले वर्ष उत्तीर्ण केल्यास बी.ए. सोशल सायन्सेसचे प्रमाणपत्र मिळेल.
द्वितीय वर्ष उत्तीर्ण केल्यास बी.ए. सोशल सायन्सेसचे पदविका प्रमाणपत्र, तिसरे वर्ष उत्तीर्ण केल्यास बी.ए. सोशल सायन्सेसचे पदवी प्रमाणपत्र आणि चौथे वर्ष उत्तीर्ण केल्यास बी.ए. सोशल सायन्सेस सोबत ऑनर्स पदवी विद्यार्थ्याला प्राप्त होणार आहे. दि. १ जूनपासून या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रकिया सुरू होणार आहे.
Discussion about this post