योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहोचणार
जळगाव । समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून प्रसिद्धी मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, समाज कल्याण अधिकारी अमोल कुलकर्णी, समाज कल्याण विभागाचे अधीक्षक राजेंद्र कांबळे उपस्थित होते.
समाजकल्याण विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्ररथाद्वारे जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सुमारे ११० गावांमध्ये दोन एलईडी चित्ररथ फिरणार असून या द्वारे समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणार आहेत. शैक्षणिक साहाय्याच्या योजना, शिष्यवृत्ती योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज, अनुदान, सामाजिक सुरक्षेच्या योजना आदी सर्व योजनांची प्रसिद्धी या माध्यमातून केली जाणार आहे.















Discussion about this post