जळगाव |: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्यादित) मार्फत समाजातील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविल्या जात असून मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण करण्यात आले आहे. मात्र अनेक लाभधारकांकडून कर्जाची नियमित परतफेड होत नसल्यामुळे नवीन कर्ज प्रस्ताव मंजूर करताना अडचणी निर्माण होत असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक गोकुलदास पगारे यांनी दिली.
महामंडळाची आर्थिक स्थिती मजबूत राहण्यासाठी व नवीन लाभधारकांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी थकीत कर्जाची वसुली करणे आवश्यक असल्याने दि. 19 फेब्रुवारी 2026 ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विशेष वसुली अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत थकीत कर्जदारांना वसुली नोटीस देणे, कर्जदार व जामिनदारांच्या घरी भेट देणे, अंतिम नोटीस पाठविणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
कर्जदारांनी थकीत रक्कम न भरल्यास जामिनदारांविरुद्ध कारवाई करून पगारातून रक्कम कपात करण्याबाबत संबंधित कार्यालयास कळविण्यात येईल. तसेच दिलेले धनादेश बँकेत जमा केल्यानंतर ते परत आल्यास कन्जुमर अॅक्ट कलम 138 अ नुसार कायदेशीर कारवाई करून न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असल्याचेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय अनेक लाभधारकांनी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा इतर कांमासाठी गैरवापर केल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. थकीत कर्जदारांमुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही महामंडळाच्या भविष्यातील कर्ज योजनांचा लाभ मिळू शकणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.
म्हणून जिल्ह्यातील सर्व कर्जधारकांनी स्वतःविरुद्ध व जामिनदारांविरुद्ध कारवाई होऊ नये यासाठी आपल्या कडील थकीत कर्जाची रक्कम तात्काळ भरून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक गोकुलदास पगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.















Discussion about this post