पुणे । उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले. पण पुणे कोरेगाव येथील पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यातून फडणवीसच, नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहादेखील आता वाचवू शकत नाहीत. मी त्यांना एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही याची खात्री बाळगा, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला.
अंजली दमानिया म्हणाल्या, “मी सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा बाहेर काढणार आहे. अजित पवारांच्या आजवरच्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्यातून वाचवलं. मात्र, यावेळी त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही.”
“मी जे घोटाळे बाहेर काढणार आहे, जे पुरावे सादर करणार आहे, ते केल्यानंतर आता अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा आणखी कोणाकडेही गेले तरी त्यांना कोणी वाचवू शकणार नाही. मी याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशांद्वारे कारवाई होईल याची काळजी घेणार आहे. एकाही खटल्यामधून त्यांना बाहेर येऊ देणार नाही,” असा थेट हल्लाबोलच दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.
“उपमुख्यमंत्रिपद आणि पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”
पुढे अंजली दमानिया यांनी म्हटले की, या जमीन व्यवहार प्रकरणात एक समिती स्थापन करण्यात आली. मात्र, सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातील आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चाैकशी करू शकेल का? निपक्ष चाैकशी ही समिती करू शकेल का? यामुळेच माझी पहिली मागणी आहे की, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदापासून ते पालकमंत्रिपदापर्यंत ताबडतोब राजीनामा द्यावा.
“शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना या जमिनीबद्दल पत्र दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. यामुळे सर्वात अगोदर या जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले पाहिजे. आम्ही तो व्यवहार रद्द करतो, म्हणजे आम्ही चोरीचा माल परत करतो, असे म्हटल्यासारखे आहे. पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब FIR दाखल करा,” असे अंजली दमानिया यांनी म्हटले. Anjali Damania Vs Ajit Pawar |















Discussion about this post