मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात घातपाताची शक्यता असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अपघाताशी संबंधित विविध बाबींवर भाष्य करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, हे आरोप नसून केवळ संशय असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे. त्यांनी अजित पवार यांच्या दौऱ्यात झालेले बदल, विमान प्रवासातील घडामोडी आणि तांत्रिक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आमदार रोहित पवार यांच्या मते, अपघाताच्या दिवशी अजित पवार यांचा नियोजित दौरा बदलण्यात आला होता. त्याचप्रमाणे विमानाची वेळ आणि पायलट बदलण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा प्राथमिक अहवाल, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ट्रान्सक्रिप्टमधील वेळेतील विसंगती, तसेच फ्लाइट रडारचा डेटा वेळेआधीच बंद पडल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
तसेच, दृश्यमानता कमी असतानाही विमान उतरवण्याचा निर्णय, विशिष्ट रनवेवर (रनवे ११) उतरण्याचा आग्रह, विमान कमी उंचीवर आणले जाणे आणि काही मिनिटे पायलटकडून कोणताही संवाद न होणे, ही सर्व बाबी संशयास्पद असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले.या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर, या घटनेची स्वतंत्र आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे
अजित पवारांचा नियोजित दौरा बदलण्यात आला
विमानाची वेळ आणि पायलट बदल
केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालातील विसंगती
ATC ट्रान्सक्रिप्टमधील वेळेतील फरक
फ्लाइट रडार डेटा वेळेआधीच बंद
कमी दृश्यमानतेत लँडिंगचा निर्णय
विशिष्ट रनवेवर उतरण्याचा आग्रह व पायलटकडून संवादाचा अभाव














Discussion about this post