मुंबई । अजित पवार यांचं विमान अपघातात झालेल्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. यादरम्यानच आता संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला असून त्यांच्या दाव्यामुळे नव्याने चर्चा रंगली आहे. त्यांच्या मते, या अपघातामागील काही घडामोडी अत्यंत संशयास्पद असून काही महत्त्वाच्या फाईल्सचा संबंध या प्रकरणाशी जोडला जात आहे.
फाईल प्रकरण आणि दिल्लीपर्यंत पोहोचलेली हालचाल :
संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, अजित पवार यांचा अपघात साधा नसून त्यात शंका उपस्थित करणाऱ्या अनेक बाबी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही प्रलंबित फाईल्समुळेच ते भाजपात गेले होते. मात्र, त्या फाईल्सपैकी एक महत्त्वाची फाईल त्यांच्या निधनापूर्वी पुन्हा उघडण्यात आली. विशेषतः जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जासंबंधीचा मुद्दा यामध्ये होता. ही फाईल थेट अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
राऊत यांच्या दाव्यानुसार, संबंधित फाईल बंद करण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र अमित शहा (Amit Shah) यांनी ती बंद करण्यास नकार दिला आणि नकारात्मक शेरा मारून ती महाराष्ट्रात परत पाठवली. त्यानंतर भाजपातील काही मंत्र्यांनी अजित पवारांना तुमची फाईल अद्याप निकाली लागलेली नाही, असे सांगण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातील मंत्र्यांकडूनही “दादा, तुमची फाईल आमच्याकडे आहे” असा संदेश देण्यात आला. त्यामुळे ज्यासाठी त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला, ते कारणच संपुष्टात आले नाही, असे राऊत यांनी नमूद केले.
या प्रकरणात रोहित पवार यांचा उल्लेख करताना राऊत म्हणाले की, ते केवळ राजकीय व्यक्ती नसून कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य आहेत. जर कुटुंबीयांना शंका वाटत असेल आणि सरकारी यंत्रणांवर विश्वास नसेल, तर त्यांनी खासगी गुप्तहेर संस्थेमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला तर त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. इतक्या मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असताना कुटुंबाचा अविश्वास ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना राऊत यांनी म्हटले की, संबंधित फाईलवरील शेरे पाहिल्यास चित्र स्पष्ट होईल. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणी कथित गैरव्यवहारामुळे कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यानंतर अचानक ही फाईल पुन्हा सक्रिय करण्यात आली. केंद्रीय सहकार मंत्र्यांनी ती बंद करू नये, असा स्पष्ट शेरा मारून फाईल परत पाठवली होती. या सगळ्या घटनांनंतर अजित पवारांनी पुन्हा मागे फिरण्याचा विचार सुरू केला आणि याच टप्प्यावर रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली, असा दावा राऊत यांनी केला.















Discussion about this post