नाशिक । राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्या दरम्यान त्यांनी “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे विधान केले आहे.
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेले होते.
नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
यावेळी पत्रकारांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी पत्रकारांनी नुकसानीच्या संदर्भात विचारले असता नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली. तर शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहेत, असे विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, शेतात जी काही पिके असतील त्यांचे रीतसर पंचनामे केले जातील असेदेखील माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.
Discussion about this post