मुंबई । एप्रिल 2026 मध्ये कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये मतदान होणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी निवडणूक विशेष चर्चेत आहे.विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील ७ जागांपैकी ६ जागा महायुती जिंकेल तर १ जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. निवृत्त होणाऱ्या सात राज्यसभेच्या खासदारांमध्ये शरद पवार यांचा देखील समावेश असून, त्यांच्या नावाची शिफारस आघाडीकडून केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे सहा जागांसाठी भारतीय जनता पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याचे चित्र आहे. यामध्ये काही महत्वाच्या नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा राज्यसभेसाठी रंगली आहे.
राज्यसभेवर आयारामाना संधी न देता पक्षातील निष्ठावंताना संधी मिळावी, यासाठी भाजपच्या काही निष्ठावंतांचे प्रयत्न सुरु आहेत. मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवले जाते. मात्र आता तरी निष्ठावंतांचा विचार व्हायला पाहिजे, असे भाजपच्या एका गटाचे मत आहे. तर भाजपमध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा सुरु आहे.
‘या’ नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
विनोद तावडे
रामदास आठवले
विजया रहाटकर
भागवत कराड
धैर्यशील पाटील
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील.















Discussion about this post