पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात इमारत कोसळल्याच्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यातील विलंबावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बचावकार्यातील नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
मोशी येथील दुर्घटनेनंतर गेल्या अनेक तासांपासून एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, लष्कर आणि वैद्यकीय पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत काही जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असली, तरी ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून नातेवाईकांमध्येही संतापाची भावना आहे.
घटनास्थळी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अशा दुर्घटनांमध्ये बचावकार्य अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणे आवश्यक आहे. दुर्घटनेत कामगारांचा जीव जाणे अत्यंत दुर्दैवी असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, कचरा डेपो आणि लोकवस्ती यांच्यात योग्य अंतर असणे आवश्यक आहे. महापालिकांनी यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापन करावे. तसेच गॅसिफिकेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुर्घटनेस जबाबदार असलेल्या ठेकेदारांसह संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राज्यातील विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. अशा गंभीर दुर्घटनेत बचावकार्य अधिक वेगाने होणे अपेक्षित होते, असे सांगत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची स्थिती शोधण्यासाठी उपलब्ध आधुनिक यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर करून नातेवाईकांना वेळोवेळी माहिती देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post