बोदवड | बोदवड शहरातील प्रभाग क्रमांक १४, मोठा मारोती मंदिर परिसरातील ४१ वर्षीय शेतकरी गणेश एकनाथ राऊत यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि यंदाच्या खरीप हंगामात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुबार पेरणीच्या संकटामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गणेश राऊत यांच्याकडे साळशिंगी शिवारात सुमारे चार एकर शेती होती. मागील वर्षी झालेल्या नापिकीमुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणी करण्यासाठी त्यांनी विकासो संस्थेकडून सुमारे ४२ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. त्याचबरोबर खासगी कर्जाचाही त्यांच्यावर मोठा भार होता.
यंदा मृग नक्षत्रात त्यांनी चार एकर क्षेत्रात मका आणि तुरीची पेरणी केली होती. मात्र, पेरणीनंतर १५ ते २० दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या गणेश राऊत यांनी ३० जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिरा सोड्याच्या बाटलीत विषारी द्रव्य मिसळून त्याचे प्राशन केले.
विष प्राशनानंतर घराजवळ त्यांना उलट्या होत असल्याचे वडील एकनाथ राऊत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने मुलगा विलास राऊत याला बोलावले. त्यानंतर गणेश राऊत यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, जळगावकडे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची नोंद बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर बोदवड ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत गणेश राऊत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे बोदवड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी आणि पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.















Discussion about this post