अमळनेर । माणुसकी आणि मानवी संवेदनांना पूर्णपणे हरताळ फासणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार जळगावच्या अमळनेरमधून समोर आला आहे. येथे आढळलेल्या एका बेवारस इसमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चक्क नगरपरिषदेच्या कचरा वाहून नेणाऱ्या ‘घंटागाडी’तून स्मशानभूमीत नेण्यात आला. या अमानुष प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
अमळनेर शहरात दोन दिवसांपूर्वी एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, दोन दिवस उलटूनही मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी किंवा तो ताब्यात घेण्यासाठी कोणीही नातेवाईक समोर आले नाहीत. अखेर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या बेवारस मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नियम आणि माणुसकीनुसार, पालिका प्रशासन किंवा रुग्णालयाने या मृतदेहाची सन्मानाने ‘शववाहिकेतून’ वाहतूक करणे बंधनकारक होते. मात्र, नगरपालिकेच्या संबंधित ठेकेदाराने असंवेदनशीलतेचा कळस गाठत, या मृतदेहाला थेट कचऱ्याच्या घंटागाडीत टाकून स्मशानभूमीकडे रवाना केले.
या गंभीर प्रकरणाची कुणकुण लागताच अमळनेर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गणेश शिंदे यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित ठेकेदारावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, एवढेच नव्हे तर या अमानुष कृत्यासाठी त्या ठेकेदाराला थेट ‘ब्लॅकलिस्ट’करण्याची कारवाई केली जाईल. असे ते म्हणाले.















Discussion about this post