मुंबई: राज्यात सध्या हवामानाचे दुहेरी रूप पाहायला मिळत आहे. एकीकडे उन्हाचा चटका आणि आर्द्रता वाढल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडण्यास तयार नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
मराठवाड्याच्या काही भागात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४४°C च्या वर गेला आहे. अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४५.९°C तापमानाची नोंद झाली असून, शहरात उष्णतेचा प्रचंड प्रकोप पाहायला मिळत आहे. मालेगावातही उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले असून भूजल पातळी खालावल्याने तालुक्यातील विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वाढत्या आर्द्रतेमुळे दमट वातावरण तयार झाले असून नागरिकांना घामाचा असह्य त्रास सहन करावा लागत आहे.
दुसरेकडे जळगाव जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा कायम असून सलग तिसऱ्या दिवशी १४ मे रोजी जळगाव शहराचे तापमान ४५ अंशांच्या पुढेच्च नोंदविले गेले. हवामान विभागाने वर्तवलेल उष्णतेच्या लाटेचा अंदाज खरा ठरला असून सलग तीन दिवस जळगावकरांना लाहीलाई करणाऱ्या उन्हाचा सामना करावा लागला आहे.आगामी काही दिवसांसाठी हवामान तज्ज्ञांच्या मते, जरी उष्णतेची लाट ओसरली असली तरी तापमानाचा जळगाव शहर व जिल्ह्यातील पारा ४३ ते ४४ अंशांच्या दरम्यानच स्थिर राहणार आहे.
इथे उष्णतेच्या लाटेचा इशारा:
जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, अकोला, वर्धा, पालघर, रायगड, मुंबई आणि ठाणे.
या ६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
उष्णतेच्या या भडक्या दरम्यान राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जात असल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.दरम्यान हवामान खात्यानं नांदेड, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.















Discussion about this post