जळगाव | केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘लखपती दीदी’ उपक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक महिलांची ‘लखपती दीदी’ म्हणून तयार झाल्या आहेत.
या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिला तसेच स्वयं सहायता बचत गटातील सदस्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि त्यांच्याकडून वार्षिक किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होईल याची हमी देणे हा आहे. योजनेअंतर्गत महिलांना विविध लघुउद्योग, गृहउद्योग तसेच उत्पादनाधारित व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये जिल्ह्यास १,००,००० महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्यक्षात १,०६,०७८ महिलांनी उद्दिष्टापेक्षा अधिक यश संपादन केले असून, त्यांना सुमारे रुपये ५०० कोटी इतक्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. तसेच वित्तीय वर्ष २०२५-२६ मध्ये १,११,००० महिलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, ते उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यात आले आहे. या वर्षाकरिता देखील सुमारे रुपये 750 कोटी कर्ज रक्कम मंजूर असून, संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात अर्थ सहाय्य वर्ग करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.
या योजनेअंतर्गत महिलांकडून पारंपरिक उत्पादनांबरोबरच विविध अभिनव व मूल्यवर्धित वस्तूंची निर्मिती करण्यात येत असून, त्यांच्या उत्पादनांना राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना मिळत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी कळविले आहे की, स्वयं सहायता गटांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत त्यांना व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक सहाय्य करण्यात येत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी वाढीस लागून महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण साध्य होत आहे.















Discussion about this post