विविध योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश
जळगाव– स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती जळगाव येथे विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे साहेब, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मिलिंद चौधरी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, तालुका सरचिटणीस गिरीश वराडे, रामचंद्र पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष निवृत्ती पाटील, भाजपा आयटी सेल जिल्हाध्यक्ष वासुदेव कोळी, अभियंता शिसोदे साहेब, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बबन आप्पा वाघ तसेच ॲडिशनल गटविकास अधिकारी योगिता पाटील मॅडम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सर्वप्रथम घरकुल योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याने, संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करून लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते लवकरात लवकर वितरित करावेत, असे स्पष्ट आणि कडक निर्देश खासदार स्मिताताई वाघ यांनी दिले. “शासनाच्या योजना वेळेत पोहोचल्या नाहीत, तर त्याचा सर्वात मोठा फटका सामान्य नागरिकांना बसतो,” असे त्यांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा तसेच पायाभूत सुविधांचा लाभ व्हावा असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याचबरोबर समाजकल्याण विभागाच्या विविध योजना, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, सेस फंडांतर्गत मंजूर कामे, वित्त आयोगाच्या निधीतून राबविण्यात येणारी विकासकामे, तसेच सिंचन विहीर व गाय-गोठा अनुदान योजनांचा सुद्धा सखोल आढावा घेण्यात आला. या सर्व योजनांचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
खासदार वाघ यांनी प्रशासनाला सूचना करताना सांगितले की, “ योजनेची अंमलबजावणी ही केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयाचे चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने आणि समन्वयाने काम करावे.”
तसेच प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.या बैठकीमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरच त्याचा प्रत्यक्ष लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आढावा बैठकीत स्मिताताई वाघ यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देत, ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी व उद्योजक बनवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, महिला बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ आहेत. या गटांच्या माध्यमातून अनेक महिला लघुउद्योग, घरगुती उत्पादन व सेवा क्षेत्रात काम करत असून, त्यांना योग्य प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्या मोठ्या प्रमाणात यशस्वी उद्योजक बनू शकतात.
महिला बचत गटांनी केलेल्या उत्पादनांना चांगली आणि स्थिर बाजारपेठ मिळावी, यासाठी शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. स्थानिक पातळीवर प्रदर्शन, मेळावे, विक्री केंद्रे तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे (ई-कॉमर्स) या उत्पादनांची विक्री वाढवण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
तसेच महिला गटांना व्यवसाय कौशल्य, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, जेणेकरून त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि विक्री दोन्ही वाढतील, असेही त्यांनी सांगितले. बँकिंग सुविधा, कर्ज योजना आणि शासनाच्या विविध अनुदान योजनांचा लाभ महिलांपर्यंत सुलभपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
“ग्रामीण भागातील प्रत्येक महिला ही संभाव्य उद्योजक आहे. योग्य मार्गदर्शन, संधी आणि पाठबळ मिळाल्यास त्या केवळ स्वतःचा नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि गावाचा आर्थिक विकास घडवू शकतात,” असे मत खासदार स्मिताताई वाघ ।यांनी व्यक्त केले.महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून गावागावात आर्थिक प्रगती घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.














Discussion about this post