जळगाव । अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव करून तब्बल ५० लाख रुपयांचा विमा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मृताच्या नातेवाइकांसह डॉक्टर आणि पोलिसांच्या मदतीने रचलेला कट उधळून लावला आहे. या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.
खासगी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाख रुपयांच्या पर्सनल एक्सीडेंट विम्याचा दावा पत्नी अरुणा जाधव यांनी केला होता. दावा करताना रात्री दहिवद येथून मालेगावकडे जात असताना मोटरसायकलला काळ्या रंगाच्या थार वाहनाने धडक दिल्याने जाधव जखमी होऊन चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. यावेळी चाळीसगाव ग्रामीण येथील डॉक्टरांनी कुठलाही मृतदेह समोर नसताना, पोलिसांनी प्राथमिक अहवालसह पोस्टमार्टम रिपोर्ट दिला होता. त्यानंतर याप्रकरणी मेहुनबारे पोलिस ठाण्यात एफआयआर क्र. ८६/२०२५ अशी नोंदही करण्यात आली होती. मात्र विमा कंपनीने या विमा प्रकरणाची चौकशी केल्यानंतर,त्यात अनेक विसंगती आढळल्या.
तपासात राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या गंभीर आजाराने झाल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान त्यांच्या घरात लावलेल्या फोटोवरही मृत्यूची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ अशी नमूद असल्याचे आढळले. तसेच ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्येही त्यांची नोंद नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले. याशिवाय मृताच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळे पत्ते असल्याचे तसेच त्यांच्या नावावर इतर सुमारे १० विमा कंपन्यांकडूनही पॉलिसी घेण्यात आल्याचे समोर आले. यावरून अपघात व मृत्यूची संपूर्ण बनावट प्रकरण तयार करून विमा रक्कम मिळवण्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात अरुणा राजेंद्र जाधव, संभाजी जाधव, थार वाहनाचा चालक-मालक, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर तसेच मेहुनबारे आणि चाळीसगाव पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, तसेच विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील आणि मयताचा भाऊ मिथुन जाधव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे बनावट पद्धतीने विमा रक्कम मिळवून देणारी टोळी उघडकीस आली असून या प्रकरणात साधारणतः विविध विमा कंपन्यांकडून तब्बल साडेसात कोटी रुपयांची रक्कम हडपण्याचा प्रयत्न झाल्याचे देखील समोर आले आहे.















Discussion about this post