जळगाव/मुंबई । बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून याचा परिमाण महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात मोठे बदल होणार आहे. त्यामुळे तापमानात मोठी घट देखील होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. पहाटे आणि रात्री हवेमध्ये मोठ्याप्रमाणात गारवा जाणवत आहे. अशामध्ये हवामान खात्याने वातावरणात आणखी बदल होणार असल्याचे सांगितले आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये रात्री आणि पहाटेच्या सुमारास तापमानात घट झाल्यामुळे हवेत गारवा जास्त प्रमाणात निर्माण झाला आहे. हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे मुंबईकरांसह ठाणे आणि नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याठिकाणी तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. याचसोबत पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात तापमानाचा पारा कमी झाला आहे. त्यामुळे याठिकाणी थंडी जास्तच वाढली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सगळीकडे शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त थंडी असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाडमधील तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. धुळ्यामध्ये तापमानाचा पारा १०.५ अंशांवर पोहोचला आहे. मध्य महाराष्ट्रात १ ते ३ अंश सेल्सिअसने तापमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडी चांगलीच वाढली आहे. तर पुढच्या ४८ तासांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.
Discussion about this post