कोल्हापूर । कॉँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आरक्षणाबाबत महत्वाचं वक्तव्य केलं. तसेच भाजपवर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले राहुल गांधी?
महाराष्ट्रात आरक्षणावरून वाद असताना राहुल गांधी यांनी थेट आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं. कालच शरद पवार यांनी केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्यावी, असं म्हटलं. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी देखील आरक्षणाबाबत मत मांडलं.“आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काँग्रेस आणि इंडिया आघाडी बदलणार. आम्ही अशी आश्वासन देत नाही. आम्ही जे बोलतो ते करतोच.”, असं राहुल गांधी म्हणाले. जातीनिहाय जनगणनाबाबत देखील त्यांनी भाष्य केलं. देशात ओबीसी किती आहे, हे कुणाला माहीत नाही. लिगली कुणाला माहीत नाही. जातीगणनेनंतर अधिकृत माहिती मिळेल, असं त्यांनी म्हटलं.
“शिवाजी महाराजांनी आपल्याला संदेश दिलाय, की हा देश सर्वांचा आहे. इथे कोणावरही अन्याय होता कामा नये. त्याच विचारांचं प्रतिबंध आज आपल्याला संविधानात दिसून येतं. त्यांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे.”, असं राहुल गांधी म्हणाले.
जातीनिहाय जनगणनाबाबत मोठं भाष्य
“देशात मीडिया, न्यायालय, नोकरशाहीत किती दलित, ओबीसी, आदिवासी आहेत. कोण किती बजेट सांभाळत आहे. एखाद्याला मार लागला आणि डॉक्टरांनी एक्सरे करायला सांगितलं तर आपण करतो. जातीनिहाय जनगणना हा हिंदुस्थानचा एक्सरे आहे. आपल्याला मार लागला हे माहीत असतं पण नेमकं किती लागलंय हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे नेमकं काय होतंय हे आम्हाला जाणून घ्यायचंय. त्याचा आम्ही एक्सरे करणार आहोत.”, असं राहुल गांधी म्हणाले.















Discussion about this post