मुंबई । लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर एनडीच पुन्हा सत्तेवर येणार हे स्पष्ट झालं असलं तरी भाजपच्या पिछेहाटीमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. यावरून शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मोदी आणि भाजपावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. मोदी व त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवून टाकतो, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे, असा इशाराही देण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निकालात नरेंद्र मोदी आणि भाजपचा पचका झालाय. जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचलंय. ही खेचाखेची करत जनतेने सभ्यता आणि संस्कृतीचं दर्शन घडवलं. त्याचा गैरफायदा मोदी घेत असल्याचा आरोप ठाकरे गटाचं मुखपत्र सामनामधून केला आहे. भाजपला सरकार बनवण्याइतके बहुमत देखील मिळालेले नाही. लोकसभा निकालांनी मोदींना जमिनीवर आणल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे.
मोदींनी मान्य केलंय की, त्यांचा जन्मही इतर मानवांप्रमाणे आईच्या कुशीतूनच झालाय. मोदींना असे बोलण्याशिवाय पर्याय नसल्याचं सामनात म्हटलं आहे. कारण मोदींच्या देवत्वाचा, अवतारगिरीचा आणि बाबागिरीचा मुखवटा काशी नगरीतच जनतेने ओरबाडून काढल्याचा टोला सामनामधून ठाकरे गटाने लगावला आहे.
मोदींनी स्वतःचा पराभव मान्य केला आहे. कालच्या निकालांनी मोदी गॅरंटीला केराची टोपली दाखवल्याचं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. मोदींना आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या आधारेच सरकार चालवावे लागेल. या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील याची गॅरंटी नसल्याची टीका देखील ठाकरे गटाने केली आहे. मोदींनी महाराष्ट्रात अठरा सभा आणि अनेक रोड शो केले होते. त्या अठरापैकी चौदा जागांवर भाजपचा पराभव झाला आहे.
मोदी आणि भाजप शब्दाला जागणारा पक्ष नाही.चंद्राबाबूंना हे माहितच आहे. बाबू यांनी देखील राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे भारतीय सभ्यताआणि लोकशाहीला इजा पोहोचेल, असे कृत्य करणार नसल्याचा विश्वास सामनामधून व्यक्त करण्यात आलाय. मोदी तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा वापर करतील. परंतु ही तिसरी शपथ मोदी आणि भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.















Discussion about this post