नवी दिल्ली । पहलगाममधील हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारतानं मिशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळं उध्वस्त केले असून यानंतर पाकिस्तान चांगलाच चवताळला आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.या तणावामुळे भारत सरकारने देशातील ३२ विमानतळे १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण व संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
अमृतसर, चंदीगड, श्रीनगर, जम्मू, लेह, जैसलमेर, भुज, जोधपूर, अंबाला, पठाणकोट, कुल्लू, शिमला आणि भटिंडा यासारख्या उत्तर आणि पश्चिम भारतातील प्रमुख शहरांतील विमानतळांचा यामध्ये समावेश आहे. १५ मे पर्यंत या विमानतळांवरून कोणतेही विमान उड्डाण करणार नाही, अशी सूचना या सर्व विमानतळांवर जारी करण्यात आली आहे.
एअर इंडिया आणि इंडिगोने अनेक विमानतळांवरील त्यांची उड्डाणे रद्द केली केली असून इंडिगोने ग्राहकांना फ्लाइटची स्थिती तपासण्यासाठी व परतावा मिळविण्यासाठी लिंक्स शेअर केल्या आहेत. पाकिस्तानने शुक्रवारी रात्री जम्मू, पंजाब आणि राजस्थान या महत्वांच्या राज्यांना लक्ष्य करून ड्रोन हल्ले सुरू केले. भारताने पाकिस्तानचा डाव हाणून पाडत पाकचे अनेक ड्रोन व क्षेपणास्र हवेतच लक्ष्य करून पाडले. मात्र, या युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तान देशातील महत्त्वाच्या हवाई अड्ड्यांना, नागरी उड्डाण करणाऱ्या विमानांना लक्ष्य करू शकते, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी येथील विमानसेवा १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.















Discussion about this post