राज्यात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली असताना आता नव्या घडामोडींमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील तब्बल १५ ते २० आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून, बारामती पोटनिवडणुकीपूर्वी मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील काही नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध दर्शवला होता. मात्र, याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील एका मंत्र्याने शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतल्याचे समजते. या भेटीत विलिनीकरणासह भविष्यातील राजकीय दिशा यावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पक्षातील सततचे अंतर्गत वाद आणि मतभेद यामुळे अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली असल्याचे चित्र आहे. मतदारसंघात जनसंपर्क आणि राजकीय प्रभाव कमी होण्याची भीतीही काही आमदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय सुरक्षिततेच्या दृष्टीने काही आमदार पुन्हा शरद पवार गटाशी जवळीक वाढवण्याच्या पर्यायांचा विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
यामुळे आता येत्या काळात हे आमदार अजित पवार यांचा गट सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, तसेच दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्रीकरण होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post