नवी दिल्ली । देशात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दिवसेंदिवस यात वाढ होत चालली आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात तब्बल १२ टक्के वाढ झाल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय अपघातांची अनेक धक्कादायक कारणे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये देशात एकूण ४,६१,३१२ किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाच्या रस्ते अपघातांची नोंद झाली. यामध्ये १,६८,४९१ लोकांचा मृत्यू झाला आहे.तर ४,४३,३६६ लोक अपघाताच्या घटनेत जखमी झाले. मागील वर्षाच्या म्हणजेच २०२१ च्या तुलनेत या आकडेवारीत तब्बल ११.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मृतांमध्ये ९.४ टक्के आणि जखमींच्या संख्येत १५.३ टक्के वाढ झाली आहे.
अतिवेगाने तसेच धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे हे रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. याशिवाय, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा कारणांमुळे रस्ते अपघातांच्या घटना वाढल्याचं सांगितलं जातंय. धक्कादायक बाब म्हणजे, हेल्मेट नसल्यामुळे बाईक चालवताना झालेल्या अपघातात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात दुचाकी अपघातात ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामधील १४, ३३७ लोकांच्या डोक्यात हेल्मेट नव्हते. हेल्मेटबरोबर सीट बेल्ट न बांधलेल्या लोकांच्या देखील मृत्युमध्ये वाढ झाली आहे.















Discussion about this post