जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत जाहीर करण्यासाठी तातडीची काही पावले उचलली असून शिक्षकांच्या उन्नत अभिवृध्दी योजनेअंतर्गत (CAS) पदोन्नतीचा लाभ मिळणेबाबतचे प्रस्ताव दाखल करतांना प्रस्तावासोबत पेपर सेटींग किंवा उत्तर पत्रिकांच्या मूल्यांकनाच्या कामकाजात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
गेल्याच आठवड्यात राज्यपाल तथा कुलपतींनी विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत लावण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दि. १८ मे रोजी झाली. या बैठकीत परीक्षांच्या निकालाबाबत चर्चा झाली. विद्यापीठाने मूल्यांकनासाठी पाठविलेल्या कार्यादेशाचे पालन न करता काही शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेत सहभाग घेतला नाही, त्यामुळे परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. त्याअनुषंगाने या बैठकीत ठरले की, परीक्षेच्या कामकाजात विद्यापीठाच्या आदेशाचे पालन न करणे ही बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील कलम ४८(४) मध्ये नमूद तरतूदीचे उल्लंघन करणारी असून ज्या शिक्षकांनी उत्तर पत्रिकाच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग नोंदविला नाही. त्या शिक्षकांवर विद्यापीठाकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांचे पदोन्नतीसाठी (CAS) जे प्रस्ताव विद्यापीठात दाखल होतात त्या प्रस्तावासोबत परीक्षाविषयक विशेषत: पेपर सेंटीग किंवा मूल्यांकनाच्या कामकाजात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात येणार आहे.
आपल्या महाविद्यालयातील एकूण उत्तर पत्रिकांच्या १२० टक्के (विद्यार्थी संख्या x विषय x १.२) उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन शिक्षकांनी केल्याचे प्रमाणपत्र प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज तसेच संलग्नता नुतनीकरणाचे प्रस्ताव दाखल करतांना जोडणे आवश्यक राहील. असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एस.एस. राजपूत, प्राचार्य डॉ. ए.पी. खैरनार, डॉ. साहेबराव भूकन, सहयोगी अधिष्ठाता डॉ. गिरीषकुमार पटनायक, प्राचार्य एस.डी. बऱ्हाटे, प्राचार्य डॉ. विजय बहिरम, तसेच प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख, प्राचार्य डॉ. आय.डी. पाटील, प्रा. जयदीप साळी, प्रा. ए.एस. पाटील,प्रा. समिर नारखेडे, औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. गणेश मांझा, परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते.
Discussion about this post