पुणे : राज्यात मागील काही दिवसापासून उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक बेजार झाले आहे. उकाड्यापासून कधी दिलासा मिळेल याची प्रतीक्षा नागरिक करीत आहे. अशातच हवामान खात्याने राज्यातील विदर्भात पुढचे तीन दिवस हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे.मात्र दुसरीकडे उर्वरित राज्यात तापमानाचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने २२ ते २४ मे दरम्यान विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पश्चिमी अडथळ्यांच्या प्रभावामुळे वायव्य भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, २२ ते २४ मे रोजी विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.देशातील हवामानात सातत्याने चढउतार पहायला मिळत आहेत. दोन दिवस नागरिकांना कडाक्याचे ऊन आणि वादळी पावसाचा सामना करावा लागू शकतो.
विदर्भात मान्सून जूनच्या उत्तरार्धात
अंदमानात निर्धारित वेळेत मान्सूनचे आगमन झाले असून लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास अडथळ्याविना कायम राहिल्यास मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post